🕒 1 min read
परभणी जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानंतर्गत २०१८-१९ या वर्षात ७१ सामूहिक शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून उद्भवत असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी राहत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गंत सामूहिक शेततळ्यांची निर्मिती करून त्यामध्ये शेतातील उपलब्ध पाणीस्रोतांचे पाणी साठवून संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध होते.
पावसाचा खंडकाळ तसेच उन्हाळ्यामध्ये शेततळ्यातील पाणी ठिंबक, तुषार पद्धतीव्दारे पिकांना देणे शक्य होत आहे. संरक्षित सिंचनामुळे उत्पादनात वाढ होते. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सामूहिक शेततळे घेण्याकडे वाढत आहे. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार पाटील यांनी माहिती दिली.
२०१८-१९ वर्षात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ७१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेंतर्गत शेततळे खोदकाम, अस्तरीकरण, कुंपणासाठी आकारमानानुसार अनुदान देण्यात येते. आजवर ६६ शेतकऱ्यांना २ कोटी १२ लाख ७९ हजार रुपये एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यंदाच्या दुष्काळी स्थितीत शेततळ्यातील पाण्यावर संत्रा, मोसंबी, चिकू, आंबा आदी फळपिकांचे उत्पादन घेऊन बागा जोपासता आल्या. अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले.
शेतकरी, युवकांची निराशा करणारा अर्थसंकल्प- धनंजय मुंडे
कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…






