पुणे,दि. 24 : पुणे शहराची ओळख सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर म्हणून होण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करावे. पुण्यातील रिंगरोड तयार करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले.
पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुल ते फनटाईम थिएटर येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीष बापट, आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनिल कांबळे, सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले, पुण्यात जल, वायू, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी पेट्रोल ऐवजी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल. नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी शहराबाहेर नवीन शहरे विकसित करणे आवश्यक आहे.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलामुळे वाहतूक समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. या पुलावर डबल डेकर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तेवढ्याच खर्चात वाहतूक समस्या सोडविण्यास मदत होईल. पुणे- मुंबईसह राज्याला केंद्र सरकारकडून जेवढी मदत देता येईल तेवढी दिली जाईल. पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू आहे ही चांगली बाब आहे. पुण्यातील नदी प्रकल्प, रोप-वे व अन्य विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल.
पुणे- कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-नगर या ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर मेट्रो सुरू केल्यास बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्यासोबत वाहतूक अधिक गतिमान होईल. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोडचाही विकास केला जाईल. राज्यातील विकासाचे जेवढे प्रकल्प सुरु आहेत त्यासाठी केंद्राकडून आवश्यक तो निधी व मदत देण्यात येईल. महाराष्ट्रात जास्तीत जास्त मार्गावर मेट्रो धावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यामुळे नागरिकांना कमी दरात प्रवासाची सुविधा मिळण्यासोबत पर्यावरणालाही फायदा होईल.
नव्याने विकसित होत असलेला दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्ग जेएनपीटीपर्यंत जोडण्यात येणार आहे. राज्यातील केंद्र सरकारकडील प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधितांबरोबर लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले. समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या –
- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता होणार मोठा फायदा; जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- वनक्षेत्रालगतच्या गावातील शेतकऱ्यांसाठी सौर कुंपण योजनेच्या मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात – उद्धव ठाकरे
- राज्यातील शाळा आणि महाविद्यालये कधी सुरु होणार? याबाबत अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती
- मोफत ‘मध्यान्ह भोजन’ योजनेतून बांधकाम मजूरांना मिळणार सकस आहार – छगन भुजबळ
- मंत्रिमंडळ मोठा निर्णय: ‘या’ जिल्ह्यात साखर संग्रहालय उभारणार