‘वीज फुकटात तयार होत नाही, भाजपने शेतकऱ्यांना वीज बील न भरण्याची सवय लावून ठेवली आहे’ – नितीन राऊत

मुंबई :  राज्यातील अनेक शेतकरी चिंतेत आहे कारणं महावितरण कंपनीने शेतीच्या वीजबिल वसुलीसाठी शेतीचा वीजपुरवठा तोडण्याची मोहिम हाती घेतली आहे. यामुळे शेतीला वीजपुरवठा मिळत नसल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे,. नुकतीच पेरणी झालेली, गहू, ज्वारी, हरभरा, ऊसाला पाणी देण्याचं काम सुरु असताना वीज कनेक्शन कापलं जात असल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ऊर्जा विभागाच्या विरोधात आंदोलने देखील केली जात आहेत. भाजपच्या या भूमिकेवर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

वीज फुकटात तयार होत नाही. त्यासाठी कोळला लागतो, पैसा लागतो, कर्ज काढावं लागतं, ते आणायचं कुठून? असा सवाल नितीन राऊत यांनी केला आहे. शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेच. फार तर त्यांना वीज बिल भरण्याची सवलत देऊ शकतो आणि ती दिलेली आहे. भाजपने शेतकऱ्यांना वीज बील न भरण्याची सवय लावून ठेवली आहे. महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आला आहे तो कुठून भरायचा? असा सवाल नितीन राऊत यांनी भाजप नेत्यांना केला आहे.

वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली? कोळसा, पाणी यापासून वीज निर्मिती होते त्याला पैसे मोजावे लागतात. वीज वापरतात मग वीज बिल भरायला का नको वाटतं? मुंबई अंधारात बुडाली तेव्हाही आम्ही तत्काळ वीज पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला, असंही नितीन राऊत यावेळी म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरुनही नितीन राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारचे दिल्लीतील नेते कशी टीका करतात हेच समजत नाही. केंद्र सरकारनं इंधनाचे दर कमी करण्याचे प्रयत्न केले नाहीत. क्रूड ऑईलचे दर कमी असताना त्यांच्याकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्राकडून केलं जात आहे, अशी टीका नितीन राऊत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –