भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यास शिवसंग्राम स्वबळावर लढणार?

सार्वत्रिक निवडणुकांसाठी शिवसंग्राम आणि  भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेत भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय शिवसंग्रामने घेतला आहे. विनायक मेटे यांनी काही दिवसापूर्वी अकोल्यात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. दरम्यान अकोला दौऱ्यावर असलेले युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांनी आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

आगामी निवडणुकीत शिवसंग्राम महायुतीत असेल कि नसेल हे भाजपच्या हातात आहे, त्यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला तरच शिवसंग्राम महायुतीत असेल असं आहेर यांनी सांगितले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ‘वन बुथ टेन युथ’ ही संकल्पाही राबवण्यात येत अाहे, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभेसाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूरसह राज्यातील २० जागांवर निवडणूक लढण्याच्या दृष्टीने शिवसंग्रामतर्फे तयारी केली जात आहे. प्रसंगी या जागा स्वबळावर लढवण्याची तयारी असल्याचेही उदय आहेर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.