लसून लागवडीसाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान व लागवडीचा हंगाम

आपल्या देशात सपाट मैदानी भागात लसणासाठी उपयुक्त हवामान नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यांदरम्यान उपलब्ध असते. त्यामुळे देशभरात ९० टक्के लसणाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होते. लसूण तापमानास संवेदनशील पीक असून भरपूर व दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीचा योग्य हंगाम साधणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्यात करणे योग्य आहे.

लसूण हे पीक थंड हवेस प्रतिसाद देते. पण लसणाचा गडुा पक्व होत असताना व काढणीच्या काळात कोरडे हवामान आवश्यक असते. लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर पानाची वाढ होते व त्याची संख्या वाढते. हा काळ साधारणपणे ४५ ते ५० दिवसांचा असतो. या काळात रात्रीचे तापमान १० ते १५ अंश सें.ग्रे. व दिवसाचे तापमान २५ ते २८ अंश सें.ग्रे च्या दरम्यान लागते. तसेच हवेत ७० ते ८० टके आद्रता व ११ ते १२ तास सूर्यप्रकाश हवा.

यानंतर पाकळ्या पोसू लागतात व गडुा आकाराने वाढू लागतो. हा कालावधी ३० ते ४० दिवसांचा असतो. या काळात हवेतील आद्रता कमी व तापमान वाढलेले पाहिजे. त्यामुळे पात वाळणे गडुा सुकणे या क्रिया सुलभ होतात. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करावी.

उशिरा लागवड झाली तर गड्यांचा आकार कमी होतो, वजन कमी भरते व उत्पादनदेखील कमी येते. थंड व पहाडी क्षेत्रात लावल्या जाणा-या जाती वेगळ्या असतात. या जातीमध्ये १० ते १२ पाकळ्या असतात, परंतु प्रत्येक पाकळ्याचे वजन ४ ते ५ ग्रॅम असल्यामुळे गडुा आकाराने मोठा असतो. या जाती महाराष्ट्रातील हवामानात येत नाहीत. केवळ पाने वाढतात व पाकळ्या तयार होत नाहीत.

महत्वाच्या बातम्या –