कर्जत: केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदी विरोधात राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांकडून रस्त्यावर उतरत विरोधप्रदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विरेश आंधळकर या शेतकरी पुत्राने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटकरत राज्यपालांना शेतकरी पुत्रांना भेट देण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान थांबावे म्हणून शेतकरी पुत्र पुढे आले आहेत. केंद्र आणि राज्याचा दुवा असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना या संदर्भात सोलापुरातील युवा शेतकरी विरेश आंधळकरने इमेलद्वारे भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील नेते, अभिनेत्री कंगना राणावत तसेच इतर बड्या व्यक्तींना वेळ देणारे राज्यपाल कष्टकरी शेतकऱ्याच्या पुत्रांना भेटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे रोहित पवार यांनी ट्विटकरत ‘ महामहीम राज्यपाल महोदय हे नागरिकांच्या हक्कांप्रति अत्यंत संवेदनशील आहेत. आजवर त्यांनी कलाकार,विरोधी पक्षाचे नेते यांचं म्हणणं ऐकून सरकारला योग्य ते निर्देश दिलेत. आपण अन्नदाता व पत्रकार असल्याने राज्यपाल महोदय आपल्यालाही निश्चित वेळ देऊन आपली समस्या जाणून घेतील, असा विश्वास असल्याचं म्हंटल आहे.
महामहीम राज्यपाल महोदय हे नागरिकांच्या हक्कांप्रति अत्यंत संवेदनशील आहेत. आजवर त्यांनी कलाकार,विरोधी पक्षाचे नेते यांचं म्हणणं ऐकून सरकारला योग्य ते निर्देश दिलेत. आपण अन्नदाता व पत्रकार असल्याने राज्यपाल महोदय आपल्यालाही निश्चित वेळ देऊन आपली समस्या जाणून घेतील, असा विश्वास आहे. https://t.co/9adjcwj7yg
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 21, 2020
किसानपुत्र विरेश आंधळकरचे राज्यपालांना पाठवलेले पत्र
मा. श्री भगतसिंह कोश्यारी
महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
विषय – केंद्र सरकारकडून घालण्यात आलेल्या कांदा निर्यात बंदी संदर्भात तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या इतर समस्यां संदर्भात आपणास भेटणे बाबत
महोदय
मी विरेश आंधळकर, रा – सौंदरे, ता – बार्शी, जि – सोलापूर. मी एक पदवीधर असून माझी वडिलोपार्जित शेती आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामध्ये गावी परतावे लागले आहे. ही केवळ माझी एकटयाची परिस्थिती नसून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शहरामध्ये काम करणारी शिकणारी मुले आता गावाकडे परतलेली आहेत.
बेभरवशाचं नैसर्गिक हवामान आणि यामध्ये शेतात काही पिकलं तरी बाजारामध्ये होणारी आमच्या शेतमालाची साठमारी पाहता आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगले शिकवून शहरामध्ये नौकरीसाठी पाठवले, शेती करण्याची इच्छा असतानाही आम्हाला शहरात काम करावं लागतं. परंतु वैश्विक महामारीमुळे आता गावी परतावे लागले. त्यामुळे वडिलोपार्जित शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी काम करून उत्पन्न काढण्यासाठी जीवाचे रान केल आहे. यंदा निसर्गाने देखील साथ दिलीय मात्र त्यातच अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी यंदा मेटाकुटीला आलेला आहे. जास्त पावसामुळे रोपांवर रोग पडले 3 ते 4 हजार रुपये किलोने घेतलेले कांदा बियाणे यामुळे खराब झाले. त्यातून काही वाचलेल्या रोपांची लागण केली तर आता केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी लादली त्यामुळे कांदा भाव गडगडणार यात शंका नाही.
उत्पादन खर्च एकरी 35 – 40 हजारांच्यावर जात असताना भाव मात्र किरकोळ मिळणार असल्याने खर्चही निघणार नाही. शेतीमध्ये विजेच्या वेळा रात्री अपरात्री असतात त्यामुळे जीवावर उदार होऊन अंधारामध्ये पिकांना पाणी द्यावे लागते, रोगांमुळे हजारोंची औषधे फवारणी खत टाकावी लागतात, अशामध्ये शेतकरी आणि शेतीबद्दलचे निर्णय घेताना सरकार दरबारी आमची दखल घेतलीच जात नाही. हीच परिस्थिती राहणार असेल तर कष्टकरी शेतकऱ्यांची पोर बंडखोर बनल्यास त्याला जबाबदार शासकीय यंत्रणा आणि राजकर्ते असणार आहेत.
आपण संपूर्ण राज्याचा आधार आहात. आजवर अनेक राजकारणी, सिनेकलाकारांनी आपली भेट घेतल्यानंतर त्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. नैसर्गिक आणि सरकारी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपणच आता आधार होऊ शकता. तरी वरील सर्व परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आपली भेट मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तरी कृपया इतरांप्रमाणे आपण आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना देखील भेटण्यास वेळ द्यावा ही हात जोडून विनंती
कळावे
आपल्या राज्यातील एक शेतकरी पुत्र
विरेश आंधळकर
महत्वाच्या बातम्या –
- गहू गवताचा रस पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते गवती चहा, जाणून घ्या
- ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ३ हजार ४०१ पदांसाठी भरती सुरु
- मनुक्याच्या पाण्याने वाढवा रक्त, दूर ठेवा ‘या’ समस्या