सातारा – कोकण किनारपट्टीवर आलेल्या तोक्ते या चक्रीवादळाचा फटका पाटण तालुक्यालाही बसला आहे. वादळासह मुसळधार पावसामुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांना तातडीची मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनामार्फत पाठवून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री (ग्रामीण ) शंभूराज देसाई यांनी सांगितले.
चक्री वादळामुळे व पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आज गृह राज्यमंत्री यांनी पाटण तालुक्यातील शिरेवाडी, मंद्रुळकोळे, चिबेवाडी, केरळ आदी नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली व त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोमपे, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माझी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अजित पाटील, विद्याधर शिंदे उपस्थित होते.
सातारा जिल्ह्याला नुकताच चक्रीवादळाचा व मुसळधार पावसाचा फटका बसला. याचा परिणाम पाटण तालुक्यात विशेषत: डोंगरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. वादळी वारे व मुसळधार पावासाने घरांचे पत्रे उडाले, घरांच्या भिंती पडल्या जनतेचे मोठे नुकसान या वादळामुळे झाले आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे पाईप वाहून गेले आहेत. जवळजवळ 300 पेक्षा जास्त वीजेचे खांब पडले, काही पूर्ण निखळून पडले. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वाकलेले वीजेचे खांब तातडीने सरळ करुन विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. उद्या दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहेत. त्यांना तातडीची मदत देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे करावा व त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
- ३१ लाख क्विंटल ऊस गाळप करून ‘हा’ कारखाना बंद
- राज्यातील कोरोना रुग्ण्संखेत झाली मोठी घट; गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात
- खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 एक लाख १७ हजार ७३० मेट्रिक टन खत साठा मंजूर
- ‘या’ जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट!
- आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन