मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून आता पुन्हा एकदा पावसाचं दमदार कमबॅक होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात उद्या (रविवारी) पासून पुन्हा एकदा पाऊस होणार असून नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशा चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये रविवारी वीजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
१९ सप्टेंबर म्हणजे रविवारपासून पुढचे तीन दिवस हे राज्यात पावसाचे असणार आहेत. या दिवसांमध्ये उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत शेतीची कामं करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबत हवामान खात्याचे ज्येष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केलं आहे. ‘IMD, ने आज दिलेल्या पूर्वानुमाना व इशाऱ्या नुसार राज्यात १९ सप्टेंबर-रविवार पासून पुढचे ३ दिवस काही ठिकाणी गडगडाटासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असेल,’ असं होसाळीकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना खरिपातील पीक काढण्यासाठी पुरसा वेळ मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी – दत्तात्रय भरणे
- ‘या’ महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
- मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. १५ सप्टेंबर २०२१
- ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर कसा करावा? जाणून घ्या