महिला व बालभवनचे काम तातडीने मार्गी लावावे!- यशोमती ठाकूर यांचे निर्देश

धुळे – महिला व बालकांशी निगडित राज्य शासनाचे विविध विभाग एकाच छताखाली आणून महिला व बालकांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी महिला व बाल भवनचे काम तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

मंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळाचा आढावा तसेच ‘कोविड- 19’ काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महिला व बालविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एम. एम. बागूल, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते ‘कोविड- 19’ काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, जिल्हा वार्षिक योजनेतून महिला व बालविकास विभागासाठी तीन टक्के निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून महिला व बाल भवन साकारावयाचे आहे. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू करावी. महिला व बालभवनाबरोबरच अंगणवाडींसाठी स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करावे. ‘एमआरईजीएस’च्या माध्यमातून अंगणवाडी इमारती बांधता येतील. त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. अंगणवाडी इमारतीच्या भिंती बोलक्या कराव्यात. त्यासाठी भिंतीवर जनजागृतीपर चित्रे, संदेश काढावेत. जेणेकरून अशा अंगणवाड्यांमधून उद्याचे चांगले नागरिक घडू शकतील. त्यासाठी जिल्हा परिषद व महानगरपालिकेने आतापासूनच नियोजन करावे, अशाही सूचना मंत्री ॲड. ठाकूर यांनी दिल्या.

मिशन वात्स्यल्य अभियान प्रभावीपणे राबवावे. ‘कोविड- 19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नियमितपणे संपर्कात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. याबरोबरच ‘कोविड- 19’ मुळे पती गमावलेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ तातडीने मिळवून द्यावेत. पीएम केअर निधीसाठी धुळे जिल्ह्यातील प्रस्ताव तातडीने सादर करावेत. माता व बालमृत्यू होणार नाहीत, अशी दक्षता महिला व बालविकास विभागाने घ्यावी. प्रत्येक शासकीय कार्यालय, खासगी कंपनीच्या कार्यालयात विशाखा समिती गठित झाल्याची खात्री करावी. त्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी. महिलांसाठी स्वच्छता गृहे बांधावीत. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलाने नावीण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांबरोबर त्यांची बालकेही स्थलांतरीत होतात. या मुलांची माहिती संकलित करून शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. महिला व बालविकासाशी निगडित विविध समित्यांची नियमितपणे बैठक घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांनी महिला व बालविकास, महिला आर्थिक विकास महामंडळ, सखी वनस्टॉप सेंटर, माता- बालमृत्यू, बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य, कारागृहातील बंदिवान महिला आदींचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भदाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. बागूल, ‘माविम’चे श्री. भदाणे यांनी आपापल्या विभागांची माहिती दिली.

पालक गमावलेल्या बालकांशी संवाद

यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांनी ‘कोविड- 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांशी संवाद साधला. त्यांची आपुलकीने विचारपूस केली. राज्य शासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. काही अडचणी असतील, तर जिल्हाधिकारी किंवा माझ्याशी थेट संवाद साधावा, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –