Share

Brinjal Farming: वांगी लागवडीचे तंत्रज्ञान

Published On: 

Brinjal Farming: Healthy purple brinjal crop ready for harvest in agricultural field.

Brinjal Farming: वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्वर हंगामात खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. आहारात वांग्‍याचा भाजी, भरीत, वांग्‍याची भजी, इत्‍यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्‍या रोग्‍यांना गुणकारी असतात. वांग्‍यामध्‍ये खनिजे अ ब क ही जीवनसत्‍वे तसेच लोह, प्रथीने यांचे प्रमाण पुरेसे असते. महाराष्‍ट्रात या पिकाखाली अंदाजे 28, 113 हेक्‍टरी क्षेत्र लागवडीखाली आहे.

जमिन : 

वांगी हे पीक सर्वप्रकारच्या जमिनीमध्ये येऊ शकते. परंतु हलक्या ते मध्यम खोलीच्या, काळ्या, करड्या जमिनीमध्ये वांगी हे पीक उत्तम प्रकारे येते. काळी भारी जमीन शक्यतो वांगी पिकाच्या लागवडीसाठी वापरू नये करणा काळ्या जमिनीत कॅल्शिअम कार्बोनेटचे प्रमाण (CaCo3) जास्त असल्याने जमीन तापते व कॅल्शिअम कार्बोनेटमुळे फळांवर चट्टे पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव टोमॅटो, ढोबळी मिरचीवरही आढळतो. पाणथळ भागामध्ये अतिउष्णता असणार्‍या भागामध्ये फुलगळ मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे सोलॅनसी वर्गीय पिकानंतर वांगी घेऊ नये, करणा कॉलर रॉट (करकोचा, गळ पडणे), बांडगूळ सारखे रोग होण्याची शक्यता असते.

हवामान : 

संकरित जातीच्या क्रांतीमुळे वांगी हे पीक सर्व प्रकारच्या हवामानात उत्तमप्रकारे लागवड कराता येत असले तरी बदलत्या हवामानातले कडक ऊन, ढगाळ हवा, रिमझिम व मुसळधार पाऊस, धुई, धुके, कडाक्याची थंडी अथवा हवेतील गरम व दमटपणा असे हवामान वांगी पिकास मानवत नाही.

जाती : सुधारित :

मांजरी गोटा :

महाराष्ट्रा मोठ्या प्रमाणात लागवड होणारा हा वाण मांजरी (जि. पुणे) येथील स्थानिक जातींपासून निवड पद्धतीने शोधून काढण्यात आला आहे. या वाणाचे झाड बुटके आणि पसरट असते. पाने आणि फळांच्या देठावर काटे असतात. मध्यम ते मोठ्या आकाराची आणि गोल असतात. फळांचा रंग जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळे चवीला रुचकर असून काढणीनंतर ४ ते ५ दिवस टिकतात. पिकाचा कालावधी १५० -१७० दिवसांचा असून सरासरी हेक्टरी उत्पादन २७ ते ३० टन मिळते.

 वैशाली : 

वांग्याच्या या वाणाचे झाड बुटके आणि पसरट असून, पाने खोड आणि फळांच्या देठावर काटे असतात. फुले आणि फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून फळांचा रंग आकर्षक जांभळा असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळे झुबक्यात लागतात व ५५ -६० दिवसांत काढणीस तयार होतात. सरासरी हेक्टरी ३० टन उत्पादन मिळते. वैशाली या जातीच्या फळांची गुणवत्ता साधारण असली तरी भरघोस उत्पादन आणि लवकर येणारी असल्यामुळे ही जात शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय आहे. फळे ६० दिवसांत तोडणीला येतात. हा वाण अर्का कुसुमाकर आणि मांजरी गोटा यांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केला आहे.

प्रगती : 

हा वाण वैशाली आणि मांजरी गोटा यांच्या संकरातून तयार झाला आहे.वांग्याच्या या जातीची झाडे उंच आणि काटक असतात. पाने गडद हिरव्या रंगाची असून पाने, फळे आणि फांद्यांवर काटे असतात. या जातीची फुले आणि फळे झुपक्यांनी येतात. फळांचा आकार अंडाकृती असून रंग आकर्षक जांभळा व फळांवर पांढर्‍या रंगाचे पट्टे असतात. या जातीचे सरासरी हेक्टरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळते. हा वाण बोकड्या आणि मर रोगास कमी प्रमाणात बळी पडतो.

अरुणा : 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विकसित झालेल्या वांग्याच्या या जातीची झाडे मध्यम उंचीची ६० -७० सें.मी. असून, फळे भरपूर आणि झुपक्यात लागतात. फळे मध्यम आकाराची, गोलाकार अंडाकृती असून त्यांचा रंग चमकदार जांभळा असतो. उत्पादन हेक्टरी २५ – ३० टन मिळते.

कृष्णा :

ही वांग्याची संकरित जात असून पानाच्या बेचक्यात १ ते २ फळे येतात. फळाचा देठ लांब असतो व त्यावर काटे असतात. फळाचा आकार गोल अंडाकृती असतो. फळाचा रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे पट्टे असतात. झाडे उंच व काटक असतात व जमिनीवर लोळत नाही. पाने गर्द हिरवी आणि रुंद असतात. त्यांच्या शिरांवर काटे असतात. वाहतूक काळात फळाची चकाकी टिकून राहते. हेक्टरी उत्पादन सरासरी ४६ टन मिळते.

वांग्याच्या वरील वाणांशिवाय महिको आणि इतर खाजगी कंपन्यांच्या विविध प्रकारच्या उत्पादन देणार्‍या संकरित जाती आहेत. तर निरनिराळ्या संस्थांमध्ये विकसित करण्यात आलेल्या पुसा पर्पल लोंग, पुसा पर्पल क्लस्टर पुसा पर्पल राउंड, पुसा क्रांती, पंत सम्राट, आझाद क्रांती, पुसा अनुपम, पंजाब बरसाती, अर्का निधी, हिसार जामुनी, अर्का शीतल, अर्का केशव, पंत ऋतुराज, अर्का नवनीत, हिसार शामल, पंजाब बहार, अर्का कुसुमाकर, बारमासी अर्का शिरीष इत्यादी वांग्याचे उन्नत वाण आहेत.

ए. बी. व्ही. x :

पुसा पर्पल क्लस्टर आणि मांजरीगोटा यांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केलेला हा वाण असून फळे गुच्छात लागत असल्यामुळे उत्पादन क्षमता २५ ते ३० टन प्रति हेक्टरी एवढे आहे. फळे लहान, गोल, काटेरी असून फळांवर पांढरे व जांभळ्या रंगाचे पट्टे असतात. हा वाण पर्णगुच्छ आणि शेंडे अळीला कमी प्रमाणात बळी पडतो.

अनुराधा : 

अनुराधा हा वांग्याचा वान मांजरीगोटा व पुसा पर्पल क्लस्टर यांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केलेला आहे. गोल, काटेरी, आकर्षक रंगाची लहान फळे असणारा हा वाण पर्णगुच्छ व शेंडे अळीला कमी प्रमाणत बळी पडतो. उत्पादनक्षमता २५ ते ३० टन / हेक्टरी आहे.

लागवडीचा हंगाम : वांग्याचे पिक खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेता येते. त्यासाठी रोपवाटिकेत बियांची पेरणी आणि रोपांची लागवड केव्हा करावी याबाबतची माहिती पुढील तक्त्यात दिली आहे.

हंगाम       रोवाटिकेत बियांची पेरणी     रोपांची लागवड  
खरीप         जूनचा दुसरा आठवडा             जुलै
रब्बी         ऑक्टोबर पहिला आठवडा       नोव्हेंबर
उन्हाळी     जानेवारी पहिला आठवडा         फेब्रुवारी

बियाणे : 

संकरीत जातीचे बियाणे एकरी १२५ ते १३० ग्रॅम वापरावे. बियाणे जर्मिनेटर २० मिली व प्रोटेक्टंट २० ग्रॅम + २५० मिली पाणी या द्रावणात २ ते ३ तास बुडवून लावल्यास बियांची उगवणशक्ती वाढते व लवकर होते तसेच संभाव्य मर व नंतर होणारे कॉलर रॉंटसारखे रोग टाळता येतात.

रोप तयार करणे : 

रोपांसाठी गादी वाफे तयार करताना रोपांच्या सर्व बाजूंनी समप्रमाणात व समपातळीवर पाणी बसेल या मापाचे जमिनीचा मगदूर व उतार घ्यानात घेऊन वाफ्यांचा आकार ठरविण्याची दक्षता घ्यावी. ‘कल्पतरू’ सेंद्रिय खत वाफ्यामध्ये मिसळल्यास रोपांची वाढ जोमदार होण्यास मदत होते. कारण या खतामध्ये पुरेशा अन्नद्रव्याचा साठ असून त्याचाबरोबर जमिनीतील हवा व पाणी खेळते राहून मुळांना जमिनीतील मूलद्रव्ये सहज उपलब्ध करून देण्यास उत्प्रेरक ठरतात. दोन ओळीतील अंतर ४ इंच असावे. अशा रीतीने ‘बी’ लावल्यानंतर मातीने ‘बी’ झाकून घ्यावे. मग झारीने पाणी द्यावे. सर्वसाधारणपणे ७ ते ८ दिवसांनी बी उगवून येईल.

रोपे दोन पानांवर आल्यानंतर दर दोन दिवसांनी झारीने ३ ते ५ वेळा जर्मिनेटर, थ्राईवर व क्रॉपशाईनरने चूळ भरल्यास रोप ३ तें आठवड्यात लागणीस येते.

लागवड : 

रोपांची लागवड सरीच्या कडेला (बगलेत) करावी. लागवड करणेपूर्वी रोपे जर्मिनेटर १०० मिली प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + १० लि. पाणी या द्रावणात पूर्णपाने बुडवून लावल्यास रोपांची वाढ जोमदार होतेच, शिवाय मर, कॉलर रॉटसारखे संभाव्य रोग टाळता येतात. रोपांच्या बुडाला मातीची भर देणे आवश्यक आहे. कारण रोपे कलंडण्याचा धोका असतो.

पाणी : 

उन्हाळ्यामध्ये ४ ते ५ दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. हिवाळ्यात पाणी आठवड्याने द्यावे. उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे किंवा संध्याकाळी ६ च्या नंतर पाणी द्यावे. पाण्याचा ताण पडला तर वांगे पोसत नाही व वांग्यात बी वाढते तसेच ते बेचव लागते. वांग्याचे भरीत नीट होत नाही, घरातील स्त्रिया अशी वांगी फेकून देतात. बियातील गर उग्र लागतो. काही वेळेस अशी वांगी देठाजवळ कडू लागतात.

खते :

रासायनिक खते वांगी पिकास परवडणारी नसून सेंद्रिय खते वापरावीत. एकरी १ ते १।। टन शेणखत आणि १५० ते २०० किलो ‘कल्पतरू ‘ सेंद्रिय खत या प्रमाणात वापरल्यास वांगी पिकास पुरेशा अन्नद्रव्याचा साठा उपलब्ध होणे बरोबर या खतामुळे जमिनीत गारवा निर्मात होऊन हवा व पाणी खेळते राहते व रोपांच्या मुळांना अन्नद्रव्याचा पुरवठा नियमित व सुरळीत होण्यास मदत होते. त्याचाबरोबर जमिनीचे जैविक व भौतिक गुणधर्म यात उल्लेखनीय सुधारणा होते. खुरपणी झाल्यानंतर ‘कल्पतरू’ हे नैसर्गिक सेंद्रिय खत बांगडी पद्धतीने झाडास एक पसाभर २ ते ३ इंच अंतरावर दिल्यास फळ पोसण्यास मदत होते.

महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :

१) शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. फिकट पांढर्‍या रंगाच्या ह्या अळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात आणि त्यामुळे झाडाचे शेंडे वळून वाढ खुंटते. फळे लहान असताना अळी देठाजवळून फळात शिरून फळाचे नुकसान करते. किडीचा प्रादुर्भाव कित्येक वेळा वाफ्यातील रोपांवरच होतो आणि रोप लागवडीनंतर फळे काढणीपर्यंत चालू राहतो.

उपाय : प्रथम कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत, २.५ मिली सायपरमेथ्रीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा ४% लिंबोळी अर्काची फवारणी करावी.

२) तुडतुडे : ही पाचरीच्या आकाराची आणि हिरवट रंगाची कीड पानातील रस शोषून घेते, त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात. तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणुरोगाचा प्रसार होतो.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी रोपांच्या पुनर्लागवडीनंतर २ आठवड्यांनी १० मिली डयामेथोएट १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

३)मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानांच्या पेशीमध्ये सोंड खुपसून पानांतील रस शोषून घेते.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी १० मिली डयामेथोएट १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४) कोळी : ही सूक्ष्म कीड पानाच्या मागील बाजूवर राहून पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पानाचा खालचा भाग पांढरट लाल रंगाचा होतो आणि पानातील हरितद्रव्ये कमी झाल्यामुळे उत्पादन घटते. फळे पांढरी पडतात.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

१) मर : मर रोग हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणार्‍या फ्युजॅरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथम पिवळी पडतात. पानांवरील शिरांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोडामधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात. झाडांची वाढ खुंटते आणि शेवटी झाडा मरते.

उपाय : रोगास बळी न पडणार्‍या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडावर बुरशीनाशकाचा फवारा द्यावा. बी टाकण्यापूर्वी (जर्मिनेटर २० मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅम + २५० मिली पाणी या द्रावणात ५० ते २५० ग्रॅम बियाणे २ -३ तास भिजवून ) बीजप्रक्रिया करून रोपासाठी टाकावे.

२) बोकड्या किंवा पर्णगुच्छ : या रोगामुळे वांग्यच्या झाडांची आणि पानांची वाढ खुंटते. झाडाची पाने लहान बोकड्यासारखी किंवा पर्णगुच्छसारखी दिसतात. हा रोग अतिसूक्ष्म अशा मायकोप्लाझ्मा या विषाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रसार तुडतुडे या किडीमुळे होतो.

उपाय : रोगाच्या प्रथमावस्थेत रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. रोपे लावणीपूर्वी ती जर्मिनेटर १०० मिली + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम किंवा नुवाक्रॉन १५ मिली आणि १० लिटर पाणी या मिश्रणामध्ये ही रोपे साधारणपणे ५ मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. तुडतुडे या किडीचा बंदोबस्त करावा.

३) सूत्रकृमी (रूट नॉट निमॅटोड ) : जमिनीतील सूत्रकृमीमुळे झाडाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात आणि झाडाच्या मुळांवर गाठी येतात.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट या आयुर्वेदिक किटकनाशकाचा आणि निंबोळी पेंडीचा जमिनीत वापर करावा आणि पिकाची फेरपालट करावी. बांधने तसेच दांडाने झेंडूची लागवड करावी.

४) कॉरल रॉट -(गळ पडणे करकोचा ) : वांगी / टोमॅटो / ढोबळी मिरची / कोबीसारख्या पिकास हा रोग लागवड झाल्या – झाल्या होतो. याचे मुख्य कारण म्हणजे सर्वसाधारणपणे जमिनीमध्ये Na, Ca, Mg चे क्लोराईडस कार्बोनेट, बायकार्बोनेट सल्फेटसचे क्षार अधिक प्रमाणात असतात. पाऊस पडण्याअगोदर जमिनीत प्रचंड उष्णता निर्माण होते. जेव्हा अशा तापलेल्या जमिनीवर पाऊस पडतो, तेव्हा जमिनीतील अन्नद्रव्यांचे रूपांतर ‘सॉईल सोल्यूशन’ मध्ये होताना वरील क्षार विरघळतात आणि हे क्षार पिकांच्या नाजूक केशाकर्षक पांढर्‍या मुळ्यावर आधात करतात आणि हा आघात हळुहळु रोपाच्या / झाडाच्या आंतर सालीवर परिणाम करून पेशी कुजाविण्याचे कार्य हळुहळु सुरू राहते. हे पुढे रोपाच्या उजवीकडील शेंडा पिवळसर पाडण्यात होऊन करपा पडल्यासारखी लक्षणे दिसून लागतात.

संपूर्ण शेंडा करपून नंतर करड्या रंगाचा ठिपका असलेले व्रण रोपाच्या दोन बोटे वर दिसून येतो. याचे रूपांतर आठे दिवसात रिंग (कड) किंवा गळ पाडण्यात होऊन अन्न व पाणी वाहक पेशी तोडल्या जातात. मग झाड कोलमडते. सहजासहजी हा रोग बरा होत नाही. सप्तामृत औषधांची चुळ भरल्यास कॉलर रॉट झालेली झाडे पुनर्जिवित होतात.

याकरिता रोप १ महिन्याचे असताना (उंची ६ इंच) १० लि. पाण्यासाठी जर्मिनेटर ३० मिली + थ्राईवर ४० मिली + क्रॉंपशाईनर ४० मिली + हार्मोनी १० ते १५ मिली + प्रोटेक्टंट ( १ चहाचा चमचा ) + प्रिझम २५ मिली + न्युट्राटोन २५ मिली या प्रमाणात मिश्रण करून रोपांवरून दोन इंच अंतरावर रोपांच्या सभोवार भाजीचा एक चमचा प्रत्येकी ओतणे. या औषधाचे प्रमाण रोपांच्या / झाडांच्या उंचीनुसार वाढवत जाऊन ३ ते ४ वेळा चूळ व फवारण्या ५ ते ८ दिवसांनी, २ ते २।। महिन्यांनी व फळे लागण्याच्या सुमारास केल्यास वरील रोगग्रस्त झाडे पुनर्जिवीत होऊन फळे बहरून, टवटवीत होतात व शेतकर्‍याच्या मालास अधिक उत्पादन व दर मिळतो.

वरील कीड – रोग नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशक – बुरशीनाशकाऐवजी सुरूवातीपासून पुढीलप्रमाणे सप्तामृताच्या फवारण्या घेतल्यास झाडांची निरोगी, जोमदार वाढ होऊन निर्यातक्षम दर्जाचे वांग्यचे उत्पादन अनेक शेतकर्‍यांनी देशभर घेतले आहे.

फवारणी :

१) पहिली फवारणी : ( लागणीनंतर १० -१५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागणीनंतर ३० -३५ दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागणीनंतर ४० -४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३५० मिली + २०० लि.पाणी.

४) चौठी फवारणी : (लागणीनंतर ६० -६५ दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ ते १।। लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ३५० ते ४०० मिली + २०० लि. पाणी.

तोडे चालू झाल्यानंतर दर १५ दिवसांच्या अंतराने वरील (चौथ्या फवारणीप्रमाणे ) फवारणी करावी.

काढणी व उत्पादन : 

सर्वसाधारणपणे लागणीनंतर ५० ते ६० दिवसांत पीक फुलोर्‍यात येऊन ८० ते ८५ दिवसांनी काढणीस फळे तयार होतात. फळे निरोगी, पुर्ण वाढलेली परंतु कोवळी, टवटवीत आणि आकर्षक चमक असतानाच आठवड्यातून २ ते ३ वेळा काढावीत. काढणीस उशीर केल्यास प्रत ढासळते व भाव कमी मिळतो.

उत्पादन : 

योग्य नियोजन आणि अनुकूल हवामानात संकरित जातीचे एकरी सरासरी २० ते २५ तट उत्पादन मिळते.

खोडवा :

‘वांगी’ पिकाचा खोडवा वर्षभर यशस्वीरित्या घेता येतो. बदलत्या हवामानाचा पिकावर होणार्‍या विपरित परिणामामुळे उत्पन्न कमालीचे घटते. त्याचबरोबर खरीप हंगामाच्या विविध प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्यांची आवक मार्केटमध्ये होते असल्यामुळे वांग्याचे भावे कमालीचे घसरतात. त्यामुळे मालाचे पैसे होत नाहीत. परिणामी शेतकर्‍यास कमालीचे नैराश्य येते. यामुळे खचून न जात शेतकर्‍याने ‘टोमॅटो’ सारखाच ‘वांगी’ पिकाचा खोडवा घेतल्यास अल्प कालावधीमध्ये खोडव्याचे उत्पन्न जरी थोड्या थोड्या प्रमाणात पूर्वीपेक्षा कमी आले तरी मार्केटमध्ये आवक कमी असल्यामुळे वांग्यास अधिक भाव मिळतात.

खोडाव घेण्याकरिता : 

पहिल्या पिकाची अवस्था संपत आली असताना किंवा रोगाने झाड ग्रासले असताना किंवा फळांची संख्या कमी असून वाढ खुंटलेली असल्यास सर्व रोगट फांद्या शेंडे व पाने जिथपर्यंत झाड निरोगी दिसते, फांदी किंवा खोड हिरवेगार, तजेलदार टवटवीत दिसते त्या फांदीच्या किंवा खोडाच्या बेचक्यातील डोळ्याच्या वर एक सूतभाग सोडून वापरलेल्या ब्लेडच्या पातीच्या सहाय्याने आडवा छेद घ्यावा. हा सर्व छाटलेला भाग दूर नेऊन चघळाबरोबर जाळून टाकावा व नंतर वाफशावर जमीन असताना कुदळीने खोदून खोडास भर द्यावी.

जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट ,प्रिझम व हार्मोनी या औषधांची योग्य प्रमाणत फवारणी केली असता. चौथ्या दिवसापासून नवीन फूट येते व नवीन फूल १५ ते २० दिवसात चमकू लागते. या फवारणीमुळे झाडावर असणार्‍या विकृत फळांचे प्रमाण कमी होऊन लहान फळे झपाट्याने मोठी वाढून तजेलदार होतात व वाढलेले मार्केटचे भाव सापडू शकतात.

२ ते ३ तोडण्य झाल्यानंतर नवीन लागलेली फुले फलधारणा होऊन फळे आकार घेऊ लागतात . ही फळे दोन महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे मिळतात. नेमका या वेळेस मार्केटला माल कमी असतो. याच वेळेस आपला माल चांगल्या दर्जाचा असला म्हणजे भाव सापडू शकतात.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
पिक लागवड पद्धतपिकपाणीबातम्याभाजीपाला (Vegetables)विशेष लेख (Special Articles)
krushinama fevicon

Leave a Comment

🕘 संबंधित बातम्या