ओमायक्रॉनमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी – अजित पवार

लातूर – नवा विषाणू ओमायक्रॉनमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, एन.जी.ओ, साखर कारखाने यांचा सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

लातूर जिल्हा वार्षिक नियोजन आणि कोरोना संसर्ग वाढू नये यासाठीचे निर्बंध आढावा बैठक नियोजन भवन येथे आयोजित केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत  होते. या बैठकीला राज्यमंत्री संजय बनसोडे, जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे, आ. धीरज देशमुख, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ.अभिमन्यू पवार, आ. बाबासाहेब पाटील, महापौर विक्रांत गोजमागुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा नियोजनचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

वा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात अधिकाधिक लसीकरण करून घ्यावे, पहिला डोस 75 टक्के नागरिकांनी जिल्ह्यात घेतला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. जिल्ह्यातील जनतेला विनंती की आपला जिल्हा सुरक्षित ठेवायचा असेल मास्क वापरावा तसेच 100 टक्के लसीकरण करून घ्यावे. हे लसीकरण वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, एन.जी. ओ, विविध कंपन्या, साखर कारखाने यांनीही यात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कोरोनामुळे विकास कामावर परिणाम झाला असून या आर्थिक वर्षातल्या निधीला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी. संबंधित विभागानी हा निधी विकास कामासाठी करावा, अखर्चीत निधी 31 मार्च नंतर परत करायची वेळ येऊ देऊ नका अशा सूचनाही प्रशासनाला उपमुख्यमंत्री यांनी यावेळी दिल्या. तसेच ज्या ज्या आरोग्य सुविधा उभ्या केल्या आहेत, त्या सुविधा उत्तम चालाव्यात आणि नागरिकांना त्याचा लाभ व्हावा यासाठी आरोग्य विभागांनी काम करावे अशा सूचना दिल्या. लातूर शहरात नवीन रुग्णालय उभं करण्यासाठी लागणाऱ्या जागे बद्दलचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकी समोर ठेवावा, शासन त्याला मान्यता देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –