कर्जमाफीचा राज्यातल्या ३० लाख शेतकऱ्यांना फायदा

कर्जमाफीचा राज्यातल्या ३० लाख शेतकऱ्यांना फायदा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारच्या कर्जमाफीचा राज्यातल्या ३० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शिवाय २ लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार विशेष योजना आणण्याच्या तयारीत आहे. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजना जाहीर झाल्यानंतर तिचे किती लाभार्थी असतील याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती.

विनाअट असलेल्या या कर्जमाफीचे लाभार्थ्यांच्या संख्येबाबत सरकारने काहीही सांगितलं नव्हतं. पण सरकारच्या अंदाजानुसार राज्यातल्या ३० लाख ५७ हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून २१ हजार २०० कोटी रुपये जाणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाचा बोजा आहे त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार विशेष योजना राबवणार असल्याचंही भुजबळांनी सांगितलंय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही २ लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचं सांगितलंय.