फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला गती येईल

आटपाडी आणि मिरज पूर्व भागात द्राक्षे काढणीला आली आहेत. जिल्ह्यात केवळ पाच टक्के हंगाम सुरू आहे. द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. परंतु, मॉन्सूनोत्तर पावसाने द्राक्षाचे नुकसान झाले असल्याने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला गती येईल. यंदा द्राक्षाला चांगले दर मिळतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या आटपाडी आणि मिरज पूर्व भागात द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्यापारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. परंतु, पावसामुळे बागांचे नुकसान झाले असल्याने हंगाम लांबवणीवर पडला आहे. त्यामुळे एकाच वेळी द्राक्ष काढणीला येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातून द्राक्षाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडी वाढू लागली आहे. वास्तविक पाहता ही थंडी द्राक्ष मण्यांसाठी अपायकारक आहे. सध्या उशिरा फळ छाटणी घेतलेल्या बागा ६० ते ८० दिवसांच्या आहेत. थंडीमुळे मण्यांच्या फुगवणीवर परिणाम होऊ लागला आहे. तसेच मण्यात गोडी उतरत नाही. मात्र, एकाच वेळी द्राक्ष काढणीला येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.