आपले आरोग्य आपल्या हाती, स्वच्छ हात धुवावे आणि आरोग्य सांभाळावे – गुलाबराव पाटील

मुंबई – स्वच्छ भारत मिशन माध्यमातून स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोरोनासारखी महामारी रोखण्यासाठी  हातांची स्वच्छता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपले आरोग्य आपल्या हाती आहे. स्वच्छ हात धुवून आपले  आरोग्य सांभाळले पाहिजे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

दि. 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो.  त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, जिल्हा स्तरावरून सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकरी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, दरवर्षी या दिवसाची संकल्पना ठरवली जाते. यावर्षी ‘आपले भविष्य आपल्या हातात’ अशी संकल्पना आहे. त्यासाठी सर्वजण मिळून पुढे जाऊ या’ ही संकल्पना घेऊन हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

आपल्या हातावर असणाऱ्या असंख्य रोगजंतू आपल्या आरोग्यासाठी बाधक ठरू शकतात.  या रोगजंतूना साबणाने हात देऊन दूर केले तर सर्वांचाच भविष्यकाळ आरोग्यसंपन्न राहील. या अनुषंगाने जागतिक हात धुवा दिन निमित्ताने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात यावी.

साबणाने हात धुण्याच्या सवयीमुळे श्वसन रोगाचा मृत्यु दर 25 टक्के कमी होऊ शकतो आणि अतिसार रोगामुळे होणारे मृत्यू सुद्धा  50 टक्के कमी होऊ शकतात. हात धुण्याच्या सवयी समाजात रुजविण्यातकरिता व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवावे.

कोरोना महामारीमुळे जवळपास 2 वर्ष  बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू होत आहेत. शाळा स्तरावर देखील शालेय विद्यार्थ्यांमध्येही साबणाने हात धुण्याची सवय व्हावी याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

या जागतिक हात धुवा दिनानिमित्त पाच दिवस राज्यभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन आरोग्य संवर्धनाच्या कामात पुढाकार घ्यावा.

हात स्वच्छता संदर्भात तयार केलेल्या चित्रफितीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –