तालुका पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारे शेतकऱ्यांना मिळणार पशुधनाची नुकसान भरपाई

पूरग्रस्त भागातील विमा उतरविलेल्या आणि पुरात वाहून गेलेल्या अथवा मृत झालेल्या जनावरांच्या बाबत तालुका पशु‍धन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरून दि. न्यू इंडिया एश्योरन्स, युनायटेड इंडिया एश्योरन्स, नॅशनल एश्योरन्स, ओरिएंटल एश्योरन्स या चार कंपन्या  नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकाव्दारे दिली.

पत्रकात म्हटले आहे, दि. न्यू इंडिया एश्योरन्स, युनायटेड इंडिया एश्योरन्स, नॅशनल एश्योरन्स, ओरिएंटल एश्योरन्स या चार एश्योरन्स कंपनीने सांगली, कोल्हापूर व सातारा या ठिकाणी झालेल्या महापुरात शेतकऱ्यांकडील पशुधन पुरामुळे मृत्यू पावले आहेत, तसेच पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. अशा वीमा उतरविलेल्या पशुधनाबाबत संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी यांनी सदर जनावर मृत झाल्याचा किंवा किंवा पुरात वाहून गेल्याबाबत प्रमाणपत्र दिल्यास, त्यास अधिन राहून एश्योरन्स क्लेमव्दारे नुकसान भरपाई देण्यात येईल.

सर्व वीमा कंपनींच्या सोबत याबाबतची बैठक घेतल्यानंतर दि. न्यू इंडीया एश्योरन्स कंपनीचे महाप्रबंधक प्रदीप खांडेकर यांनी ही बाब मान्य केली असून तसा मान्यतेचा इमेल पाठविला आहे. त्यामुळे पुरग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचे पुरात गमावलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मिळण्यास  मदत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

पूर परिस्थितीमुळे स्वातंत्र्यदिनानिमित्तचा स्नेहभोजन, चहापान कार्यक्रम रद्द

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१२८.४१ मिमी पावसाची नोंद