शेतकऱ्याने दहा एकर लावलेल्या कपाशीवर फिरविला नांगर

एकूणच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळी झळा सहन करत शेतकरी दरवर्षी नव्या उमेदीने खरीप हंगामाच्या तयारीला लागतो, उसनवारी , उधारी  करून बी-बियाणे, खते खरेदी करून मोठ्या मेहनतीने पेरणीही करतो. परंतु पाऊस लांबल्याने त्याच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले जाते. अशीच परिस्थिती वडीगोद्री परिसरात दिसून आली. यातूनच हताश झालेल्या पिंगळे यांनी २३ जुलै रोजी त्यांच्या शेतातील कपाशीवर नांगर फिरविला.

वडीगोद्री येथील शेतकरी विनोद पिंगळे यांनी त्यांच्या वडीगोद्री व सौंदलगाव शिवारातील १० एकर परिसरावर जुलै पहिल्या आठवड्यात मोठ्या उमेदीने कपाशीची लागवड केली होती. लागवडीनंतर रिमझिम पाऊस झाल्याने त्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यानंतर पावसामध्ये खंड पडल्याने सर्व पिके कोमजून गेली होती. आता परत पाऊस होणार आणि पुन्हा शेत हिरवेगार होईल. पण पावसाच्या एका सरीसाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला पेरलेल्या पांढऱ्या सोन्याची चिंता लागून आहे. याच चिंतेतून अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील एका शेतक-याने आता आभाळमाया होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर घाम गाळून पेरलेल्या पांढ-या सोन्यावर मोठ्या जड मनाने  नांगर फिरविला.

या सर्व गोष्टींमुळे जवळपास ६० हजार रूपयांचा पेरणीचा खर्च वाया गेला असून तर परत पेरणीही आता शक्य नसल्यामुळे शेत मोकळे ठेवण्याची वेळ पिंगळे यांच्यावर आली आहे. आता जर येणाऱ्या आठवड्यामध्ये दमदार पाऊस झाला नाही तर अनेक शेतकऱ्यांवर अशीच नांगर फिरविण्याची वेळ येणार असल्याचे भयानक चित्र दिसून येत आहे.

तर एकीकडे राज्य शासनाकडून कृत्रिम पावसाच्या घोषणा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मध्यंतरी औरंगाबादेतून कृत्रिम पाऊस पाडावा म्हणून यंत्रणाही हलली होती. या पावसासाठी लागणारे तांत्रिक साहित्य विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारे ढगाळ वातावरणही सध्या किमान जालना जिल्ह्यात दिसून येत नाही.

सोलापूर आणि त्या भागामध्ये मंगळवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्याची माहिती देण्यात येत आहे. परंतु जालना, औरंगाबाद या भागात हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, याबद्दलही शंका घेतली जात आहे. तर दुबार पेरणी करण्यासाठीची नेमकी तारीखही कृषी विभागाकडून कळविली जात नाही.

महत्वाच्या बातम्या –

काही लोक सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात, तर आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?

धनिकधार्जिणा व शेतकरी, मध्यमवर्गीयांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प! – अशोक चव्हाण