मराठवाड्यातील पहिली योजना, सीएनजीमार्फत घरोघरी मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस

लातूर – लातूर शहरात लवकरच पाईपलाईनद्वारे गॅस मिळण्याच्या व्यवस्थेमुळे या शहरातील उद्योगालाही चालना मिळणार असून लातूरच्या विकासाला आता यामुळे गती मिळेल. औसा तालुक्यात इंधनावर आधारित नवीन औद्योगिक वसाहत स्थापन्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
महानगरपालिकांतर्गत औसा रोड येथे अशोका गॅस एजन्सीजच्या सीएनजी गॅस पाईपलाईनच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विरोंधी पक्षनेते दिपक सुळ, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, ॲड. किरण जाधव यांच्यासह पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.
पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, मनपाच्या पुढाकाराने लातूर येथे अशोका गॅसद्वारे घरगुती वापराचा पुरवठा करण्याचा शुभारंभ होत असल्याबद्दल आपल्याला मला आनंद होत आहे. या कार्यासाठी मी मनपाचे अभिनंदन करतो. मराठवाड्यात लातूर हे पहिलं शहर आहे, जिथे पहिल्यांदा स्वयंपाकाचा गॅस शुभांरभ केलेला आहे. स्व. विलासराव देशमुख यांच्या “जे-जे नवं, ते-ते लातूर हंव” या ब्रीद वाक्याप्रमाणे लातूरच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत. औसा तालुक्यातील आशिव येथे मदर स्टेशनही सुरु होणार आहे. पाईप नॅचरल गॅस इतर वाणिज्य उद्योगासाठीही वापरला जातो. पर्यावरणाला पोषक अशा गॅसची सोय होत आहे. तसेच हा गॅस प्रत्येक घराला उपलब्ध झाला पाहिजे यादृष्टीने मनपाने कामे करावीत असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री श्री. देशमुख पुढे बोलतांना म्हणाले की, सामान्य माणसाला समोर ठेवून हॉस्पीटल, रेस्टॉरंट, शाळा, शोरुम, शॅाप्स, होम, रेस्टॉरंट यांच्यापर्यंत जलदगतीने पीएनजीने पोहचवावं. गॅसचे नेटवर्क परिणाममकारक ठरावं. सीएनजी / पीएनजी पर्यावरणाला पोषक असणार आहे. लातूर मनपाचा कारभार पारदर्शक आहे त्यांनी कायम सामान्य माणासांची सेवा व्हावी, हाच मुळ दृष्टीकोन समोर ठेवून कार्य करावे.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण

येणाऱ्या काळात कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मनपा लसीकरण मोहिम राबवत आहे, ते लसीकरण येत्या काळात अधिक जलदगतीने पूर्ण करावे. तसेच येत्या काळात लातूरच्या विकासाठीच्या निधीबाबतही निश्चितपणे योग्य निर्णय घ्यावेत, शासनही मदतीसाठी तत्पर आहे.
सामान्य माणसांची गरज ओळखून शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीचा निर्णय घेऊन 30 ते 40 हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. तसेच कोविडला आपल्याला तोंड द्यावे लागले आहे, दोन वर्षे आपण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहोत. त्यासाठी लसीकरणाची गती वाढवून या मोहिमेला नागरिकांनी बळ दिले पाहिजे. तसेच मनपाने 31 डिसेंबरपर्यंत लसीकरणाचे काम पूर्णत्वास न्यावे असे सांगून लसीकरण पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्रीय सहभाग घेवून युध्दपातळीवर कार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
कोविड-19 या विषाणूचा सामाना करण्यासाठी लसीकरणाचा व्यवस्थित व्यवस्थापन करुन येणाऱ्या काळात ते पूर्ण कराल अशीही अपेक्षा पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा मनपा प्रशासनाकडून व्यक्त केली.
मनपातंर्गत सिटीबसचाही विस्तार कानाकोपऱ्यात व्हावा. तसेच इलेक्ट्रीकल चार्जिंग पोर्ट सुरु करण्याचाही प्रयत्न मनपाने करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या.
मनपाच्या जागेत मनपाने रुग्णालय उभे करण्याचा प्रयत्न करावा.त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –