हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या; सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पत्र पाठवून केली मागणी

मुंबई – हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळवून द्यावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवत केली आहे. या मौल्यवान तंबाखूच्या निमित्ताने तरी महाराष्ट्रातील शेतकरी श्रीमंत होईल, असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली होती. एनसीबीला तंबाखू आणि अमली पदार्थातील फरकही कळत नाही, अशी टीका एनसीबीवर केली होती. हाच धागा पकडत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पत्र पाठविले आहे. सरकार मदत करत नाही हे बघून अनेक शेतकऱ्यांना गांजासारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे. गांजा ही एक जगात कायम मागणी असलेली वनस्पती आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

राज्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक शेतकऱ्यांना हर्बलची तंबाखूची शेती करायची आहे, पण राज्यात गांज्यासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करायची असल्यास सरकारची परवानगी लागते. जी सहज मिळत नाही, पण अलीकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरिष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे. नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखूतून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत, असंही खोत पत्रात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –