जलसंवर्धन योजनेतून ७ हजारांहून अधिक प्रकल्पांची दुरुस्ती; १ हजार ३४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार

मुंबई – मृद व जलसंधारण विभागामार्फत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 7 हजार 916 जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी 1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अंतर्गत मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील 0 ते 100 हेक्टर, 101 ते 250 हेक्टर आणि 251 ते 600 हेक्टर या सिंचन क्षमतेच्या एकूण 90 हजार योजनांपैकी अतिधोकादायक, धोकादायक व दुरुस्तीयोग्य असलेल्या सुमारे 16 हजार जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे प्रकल्पांची दुरुस्ती करून मूळ पाणी साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे असे आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतील 7 हजार 916 प्रकल्पांच्या दुरुस्तीकरिता 1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा करण्यात आला आहे. यानुसार सर्व प्रकल्पांच्या दुरुस्तीची विशेष मोहीम सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23 अशा तीन वर्षात करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामाला गती देऊन आतापर्यंत या विभागाने गेल्या दोन वर्षात 306 कोटी रुपयांच्या 1 हजार 405 योजनांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

जलसंधारण विभाग, जलसंपदा, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग , कृषी विभाग आणि सर्व जिल्हा परिषद यांच्याकडील 16 हजार नादुरुस्त प्रकल्पांची दुरुस्ती करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. आजपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून राज्यांत ० ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेचे अनेक प्रकल्प निर्माण केले गेले परंतु किरकोळ देखभाल दुरुस्तीअभावी यांची दुरावस्था झालेली आहे. या सर्व प्रकल्पांच्या दुरुस्तीमुळे 8 लाखांहून अधिक टी.सी.एम पाणीसाठा पुनर्स्थापित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –