‘या’ शहरातील पाणीपुरवठा समस्या तातडीने सोडवा – गुलाबराव पाटील

मुंबई – अंबरनाथ शहराला सद्यस्थितीत जलसंपदा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जलसाठ्यांमधून पाणीपुरवठा होतो. या शहराची पाण्याची मागणी आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारे पाणी यामध्ये सध्या असलेली तफावत जलसंपदा आणि एमआयडीसीने समन्वयाने तातडीने सोडवावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

अंबरनाथ शहराची पाण्याची मागणी 140 द.ल.लीटर असून प्रत्यक्षात 120 द.ल.लीटर पाणी प्राप्त होत आहे. या वाढत्या पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार बालाजी किणीकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, ठाण्याचे मुख्य अभियंता श्री.निगोट, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता श्री.नागे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अरूण निरभवणे, कार्यकारी अभियंता श्री.बसनगार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ आदी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, अंबरनाथ शहरामध्ये ज्या ठिकाणी पाण्याच्या अनधिकृत जोडण्या असतील त्या तातडीने काढण्यात याव्यात. सन 2048 च्या संभाव्य लोकसंख्येनुसार अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठी 228.68 द.ल.लीटर पाण्याची आवश्यकता असून सध्या 168 द.ल.लीटर पाण्याचे आरक्षण उपलब्ध आहे. अतिरिक्त 60 द.ल.लीटर पाण्याच्या आरक्षणाबाबत जलसंपदा विभागाकडे मागणी करण्यात यावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अंबरनाथ शहराकरीता आवश्यक अतिरिक्त पाण्याची साठवण क्षमता तयार करावी. त्याचबरोबर एमआयडीसीने तातडीची उपाययोजना म्हणून शहरास अतिरिक्त 10 द.ल.लीटर पाणी पुरविण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –