‘महा आवास’ अभियान उपक्रमांतर्गत उद्दीष्टपूर्तीसोबतच कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्या – छगन भुजबळ

नाशिक – ‘महा आवास’ अभियान उपक्रमांतर्गत उद्ष्टिपूर्तीसोबतच कामे अधिक दर्जेदार होण्यासाठी कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा, असे  प्रतिपादन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित नाशिक जिल्हा ‘महा आवास’अभियान 2.0 जिल्हास्तरीय कार्यशाळेत पालकमंत्री श्री. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके, जयंत ठोंबरे यांच्यासह जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, प्रशासक आदि व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यावेळी म्हणाले, समाजातील गरजू व घरापासून वंचित असलेल्या लोकांना महा आवास अभियानांतर्गत प्रथम प्राधान्य देवून त्यांना घरकुल उपलब्ध करून द्यावेत. घर बांधण्यासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारत बांधतांना त्यांचा कामाचा दर्जा खालावणार नाही याकडे संबधित अधिकारी व यंत्रणा यांनी कटाक्षाने व जबाबदारीने लक्ष देणे आवश्यक आहे. शासनाने या उपक्रमासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अधिकाधिक  तळागाळातील गरजू घटकांपर्यत घरकुलाचा लाभ पोहचेल  याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे व कामे गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यावेळी  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके यांनी  महा आवास अभियान ग्रामीण नाशिक जिल्हा बाबत माहिती दिली. श्रीमती. बावके म्हणाल्या, सन 2016-17 पासून 20 नोव्हेंबर, 2020 हा दिवस राष्ट्रीय आवास दिन म्हणून साजरा केला जातो. सन २०२०-२१ या वर्षातील महा आवास अभियान-ग्रामीण प्रमाणेच सन २०२१-२२ या वर्षात देखील राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक २० नोव्हेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत महा आवास अभियान-ग्रामीण २.० राबविण्याचे निश्चित केलेले आहे. सन २०२०-२१ या वर्षातील महा आवास अभियान कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ५०५९ व राज्य पुरस्कृत आवास योजनांतर्गत १७१५ अशी एकूण ६७७४ घरकुले नाशिक जिल्ह्यात पूर्ण करण्यात आली आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत प्राधान्यक्रम यादीतील ६९९५५ लाभार्थ्यांपैकी ५८६३५ (८५.४९%) घरकुले पुर्ण झाली आहेत. राज्य पुरस्कृत आवास योजनांमध्ये देखील १९१११ घरकुलांपैकी १४३०० (७५.४२%) घरकुले पुर्ण झाली आहेत. केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनांतील शिल्लक घरकुले या महा आवास अभियान-ग्रामीण २.० मध्ये पुर्ण करण्यात येणार आहेत.

आवास प्लस (ड यादी) मध्ये २८८१७१ कुटुंबांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी २३४४७६ कुटुंब सिस्टीमद्वारे पात्र झालेले आहेत. त्यांची अंतिम प्राधान्यक्रम यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदर यादी ग्रामपंचायत निहाय तयार झाल्यावर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सन २०२१-२२ करीता प्राप्त उद्दिष्ट १८६६८ ची मंजुरी महा आवास अभियान ग्रामीण २.० मध्ये देण्यात येईल. महा आवास अभियान-ग्रामीण २.० मध्ये असलेले १ ते १० उपक्रमांमध्ये नाशिक जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके यावेळी व्यक्त केला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते  महा आवास अभियान योजनेचे  पोस्टर  व जिंगल्स यांचे अनावरण करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –