पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले

मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भाज्यांचे झाले आहे. जाग्यावरच फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. वाटाणा, शेंवग्याचा किलोचा दर 150 रूपये, तर तोंडली, गवारच्या दराने 120 रूपयाचा आकडा गाठला आहे. त्यामुळेच भाज्याच्या दराचा भडका उडाल्याने सर्वसामान्यांवर भाज्यांची खरेदी नको रे बाबा म्हणण्याची वेळ आली आहे.

अतिवृष्टीमुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. ग्राहकांकडून दर्जेदार पालभाज्यांना मागणी होत असल्याने मार्केट यार्डातील मे.सर्जेराव सुर्यवंशी या आडतदाराने चक्क दिल्लीवरून १ ट्रक कोथिंबीर विक्रीस मागविली. त्यास घाऊक बाजारात १० ते २० रूपये भाव मिळाला. तर, गावरान कोथिंबीरला एका गड्डीस ५० ते ५५, सटाणा ३२ ते ३८ रूपये भाव मिळाला. तर किरकोळ बाजारात गावराण कोथिंबीरच्या एका गड्डीचा दर ७० ते ८०, परराज्यासह इतर कोथंबीरीचा दर ५० ते ६० रूपयांवर पोहचला आहे. तर, इतर पालेभाज्यांचा एका गड्डीचा दर २५ ते ४० रूपयावर पोहचले आहे.

पावसामुळे शेतातच पालेभाज्या खराब झाल्या आहेत. बाजारात सध्या दाखल होत असलेल्या बहुतांश पालेभाज्यांची प्रतवारी खालावली आहे. दर्जेदार पालेभाज्यांना केवळ चांगली मागणी आहे. आज बाजारात सर्व पालेभाज्यांची मिळून ७० ते ८० हजार गड्ड्यांची आवक झाली. इतर दिवशी ती दीड ते अडीच लाख गड्ड्या इतकी असते.

याबाबत किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे म्हणाले, बाजारात पालेभाज्यांची आवक कमी होत असून त्यात खराब भाज्यांचे प्रमाण आहे. त्यामुळे दर्जेदार पालेभाज्यांना चांगला दर आला आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीर ५० ते ८० रूपयांपर्यंत दर असून मेथी, मुळा, पालक, शेपू, कांदापात आदी पालेभाज्यांचे दर २५ ते ४० रूपयांवर पोहचले आहेत.

परतीच्या पावसाचा कालावधी लांबल्याने नव्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा जमिनीतच सडत असल्याने महिनाअखरेरपर्यंत नवीन कांद्याची आवक अशक्य आहे. त्यामुळेच आणखी महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहणार आहेत. त्यानंतर मात्र काही प्रमाणात दर कमी होणार असल्याचा अंदाज व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला.

सद्य:स्थितीत जी आवक होत आहे. तो भिजलेला कांदा आहे. त्यामुळे त्याचा दर्जा खालावलेला आहे. तरी मागणी अधिक असल्याने घाऊक बाजारात 10 किलो कांद्याला 450 ते 520 रूपये दर मिळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीक कांद्याची आवक सुरू होईल. बाजारात आवक वाढल्यास दरातही घट होणार असल्याचेही पोमण यांनी सांगितले.

मागील आठवडाभरापासून पुणे जिल्हा, विभागासह जोरदार पाऊस कोसळत आहे. परिणामी सततच्या पावसाच्या मार्‍यामुळे यामुळे गवार, तोंडली, वांगी, भेंडी, शेंवगा, कारली, फ्लॉवर, वाटाणा, कांदा आदी फळभाज्या व कोथिबीर, पालक, मेथी, शेपूर, कांदापात, अंबाडी चवळई आदी पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील घाऊक बाजारातच आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाज्यांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच मागील चार दिवंसात काही फळभाच्यांच्या किलोच्या दरात 20 ते 30 रूपये तर काहींच्या दरात 40 ते 50 रूपयांची वाढ झाली आहे. पालेभाज्यांच्या गड्डीच्या दरात 10 ते 15 रूपयांनी वाढ झाली आहे.

भाज्यांचे घाऊक व्यापारी निखील भुजबळ म्हणाले, पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळेच घाऊक बाजारातही भाज्यांचे दर वाढले आहेत. जो माल येतोय तो भिजलेला आहे. त्यामुळे त्यास मागणी कमी आहे. एक दिवस पावसाने उघडीप दिल्याने बुधवारी चांगल्या प्रतीच्या भाज्यांची आवक झाली. उठावही चांगला होता. दरही चांगला मिळाला.

महत्वाच्या बातम्या –

कृषी अधिकारी पोहचले बांधावर ; पिकांचे पंचनामे अजूनही सुरुच

सांगली शहराला महापुराचा मोठा फटका ; 31 हजार नागरिकांचे, तर 4 हजार जनावरांचे स्थलांतर

मोठी बातमी ; शेणखताच्या दारात वाढ

उद्योग उभारणीसाठी रशियन स्टील कंपनीला सहकार्य करणार – मुख्यमंत्री