खरीप हंगामासाठी  प्रधानमंत्री पीक विमा योजना

खरीप हंगामासाठी  प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी २४ जुलपर्यंतची मुदत आहे.

जिल्ह्यातील विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होवून आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी केले आहे. तसेच पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखून शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास आर्थिक मदतीची शाश्वती मिळणार आहे.

पीक पेरणीपासुन काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणी अथवा लावणीपूर्वी नुकसान भरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येणार आहे. तसेच पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखून शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास आर्थिक मदतीची शाश्वती मिळणार आहे.

जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पिक विमा बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकºयांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता कापूस पिकासाठी ५ टक्के व अन्य पिकांसाठी दोन टक्के मर्यादित ठेवण्यात आला आहे. योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिम स्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.

ऐच्छिक शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्याची अंतीम मुदत २४ जुलै आहे. कापूस व सोयाबीन या मुख्य पिकांना ४३ हजार रुपये विमा संरक्षण देण्यात आले आहे. शासनाने खरीप हंगामासाठी पीक विमा योजना लागू केली आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतीम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

अर्ज भरताना ही लागणार कागदपत्रे

अर्ज भरताना आला फोटो असलेल्या खातेपुस्तकाची प्रत, आधार कार्ड प्रत, आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावती किंवा किसान क्रेडीट कार्ड, नरेगा जॉबकार्ड कार्ड, वाहन चालक परवाना व मतदान ओळखपत्र यापैकी एक पुरावा सोबत आणावा. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँकेचे कर्ज खात्याशी आधार क्रमांक जोडला नसल्यास संबंधित बँकेशी त्वरीत संपर्क साधावा. त्याचप्रमाणे बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमूद करावा लागणार आहे.