देशातील ‘या’ १३ राज्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचा केंद्र सरकारचा आदेश

नवी दिल्ली – पुन्हा एकदा जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राज्यांनी कोरोना चाचण्या (corona tests)वाढवण्याचा आदेश देशातील १३ राज्यांना देण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह (Maharashtra)पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, नागालँड, सिक्कीम, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, राजस्थान, जम्मू-काश्मीर या राज्यांसह लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारांना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan)यांनी पत्र पाठवून कोरोना चाचण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात झालेली घट चिंता वाढवणारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची आणि कोरोनाबाधितांच्या संख्येची सविस्तर माहिती घ्यावी, असा सल्ला भूषण यांनी या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.

दरम्यान देशात गेल्या ५३८ दिवसांतील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या मंगळवारी नोंदली गेली आहे. १ लाख ११ हजार ४८१ इतकी रुग्णसंख्या नोंदली गेली असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.३२ टक्के इतकी आहे. तर कोरोनामुक्त होण्याची टक्केवारीदेखील ९८.३३ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले आहे.